धाराशिव
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी लोकशाही दिनाच्या अनुषंगाने नागरिकांच्या तक्रारींची तातडीने व प्रभावी सोडवणूक करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.तसेच दर महिन्याला तालुका व जिल्हास्तरावर लोकशाही दिन आयोजित केला जातो.नागरिकांनी प्रथम तालुकास्तरीय लोकशाही दिनात तक्रार दाखल करावी.त्या ठिकाणी तक्रारींचे निराकरण झाले नाही तरच जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार दाखल करावी,असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती.शफकत आमना, उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.भंडे, कार्यकारी अभियंता श्री.केत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. हर्षल डाके यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.पूजार म्हणाले की, नागरिकांच्या तक्रारी केवळ औपचारिकतेसाठी न घेता गंभीरतेने हाताळल्या पाहिजेत.तालुका पातळीवर तक्रारी निकाली काढल्यास नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचेल तसेच त्यांना न्याय मिळेल.”असे ते म्हणाले.
आजच्या लोकशाही दिनात एकूण ११ तक्रारी प्राप्त झाल्या.यामध्ये –भूमी अभिलेख विभाग – १, मुख्याधिकारी धाराशिव – १,वीज वितरण कंपनी – १, तहसिलदार धाराशिव – १, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) – १,जिल्हा परिषद पंचायत विभाग – २,सहाय्यक निबंधक मुद्रांक व नोंदणी विभाग धाराशिव – २,तहसिलदार लोहारा – १, जिल्हाधिकारी कार्यालय नैसर्गिक आपत्ती विभाग – २,या तक्रारींचा समावेश आहे. यापूर्वी एकूण ३५ तक्रारी प्राप्त झाल्या. प्राप्त तक्रारींपैकी १७ तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून १८ तक्रारींची कार्यवाही संबंधित विभागांमार्फत सुरू आहे.






