तुळजापुर
“फक्त वीजपुरवठा नाही, तर आशेचा किरणही”
सामाजिक बांधिलकी जपत महावितरण परिवार पुन्हा एकदा गरजूंच्या मदतीस धावून आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम-परंडा परिसरातील पूरग्रस्त ४० शेतकरी बांधवांना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रत्येकी ₹५०००/- इतकी थेट आर्थिक मदत केली.
अलीकडील पुरामुळे भूम-परंडा परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पिकांसह घरांची हानी होऊन अनेक कुटुंबे संकटात सापडली आहेत. या गंभीर प्रसंगी महावितरण परिवाराने “शेतकरी बांधवांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची” भूमिका घेत मदतीचा हात पुढे केला.
महावितरण धाराशिवमधील अधिकारी व कर्मचारी वर्ग सातत्याने सामाजिक उपक्रमांतून समाजातील गरजू, निराधार कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. या मदत उपक्रमालाही सर्व स्तरांतील अधिकारी, कर्मचारी व संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषतः अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता धाराशिव-तुळजापूर यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
महावितरण कर्मचाऱ्यांची ही मदत ही केवळ आर्थिक सहाय्य नसून पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारी आहे.
महावितरण परिवार समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी भविष्यातही अशाच प्रकारे पार पाडत राहील, असा दृढ संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.






